पुणे : ‘पुलवामा’मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात अनेक ठिकाणी काश्मिरी विद्यार्थ्यांवर हल्ले झाले. त्या पार्श्वभूमीवर येथील ‘सरहद’ संस्थेत ‘सरहद - जम्मू-काश्मीर विद्यार्थी संघटने’च्या पुढाकाराने पुण्याचे पोलीस उपायुक्त बच्चनसिंग यांनी काश्मीरमधील विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी काश्मिरी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी सर्वोच्च न्यायालय आणि पंतप्रधान यांनी देशवासियांना आवाहन केले होते. त्या धर्तीवर हा संवाद साधण्यात आला. ‘पुण्यातील पोलीस अधिकाऱ्यांनी काश्मिरी विद्यार्थ्यांबाबत सदैव उदार दृष्टीकोन बाळगला आहे’, असे विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष आकीब भट आणि सचिव जावेद वाणी तसेच उपाध्यक्ष ओवेस वाणी यांनी नमूद केले.
‘या शहरातील लोक चांगले वागणाऱ्यांशी जास्त चांगले वागतात’, असे नमूद करून पोलीस उपायुक्त बच्चनसिंग यांनी जम्मू काश्मीरच्या नागरिकांनी अथवा विद्यार्थ्यांनी कोणत्याही अडचणीला पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन केले. तसेच, ‘आपल्याकडून कोणताही नियम भंग अथवा अतिरेकी कृत्य याला हस्ते परहस्ते मदत होणार नाही याची काळजी घ्यावी’, असे आवाहनही त्यांनी केले.
समन्वयक जाहिद भट यांनी, ‘अशा प्रकारच्या काही तुरळक घटना जरी घडल्या, तरी करणारा एक असेल तर काश्मिरी लोकांना मदत करणारे शेकडो आहेत. याचा अनुभव पुणे शहरात वेळोवेळी आला’, असे नमूद केले. यावर खान तसेच उमर गुरू या दोघांनी, ‘पोलिसांनी या संवादासाठी पुढाकार घेतल्याने मनातून भीती वाटणाऱ्या काश्मिरी विद्यार्थ्यांना आधार वाटला’, असे नमूद केले. ‘सरहद – जम्मू-काश्मीर विद्यार्थी संघटने’चे अध्यक्ष आकीब भट यांनी पुण्यातील काश्मिरी विद्यार्थी तसेच नागरिकांची माहिती संकलित करून त्यांना जम्मू काश्मीर सबंधित शासकीय अधिकारी तसेच स्थानिक इतर संघटनांशी समन्वय साधून देणार असल्याचे जाहीर केले.
या संवादासाठी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू पवार तसेच पोलीस निरीक्षक (गुन्हे) विष्णू नाथा ताम्हाणे हेदेखील हजर होते. त्यांना काश्मिरी विद्यार्थ्यांच्या समन्वयासाठी नेमल्याचे या प्रसंगी बच्चनसिंग यांनी जाहीर केले, अशी माहिती सरहद संस्थेच्या पत्रकात देण्यात आली आहे.